मराठवाड्यात दुष्काळाचे सावट ! बीड जिल्ह्यात केवळ १६% पाणीसाठा; आष्टीत उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ
बीड: गेल्या दीड महिन्यापासून पावसाने संपूर्ण पाठ फिरवल्यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील हाताशी आलेली सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, आष्टी तालुक्यात हताश शेतकऱ्यांनी पिकांमधून काहीच उत्पन्न मिळण्याची आशा न उरल्याने उभ्या पिकांमध्ये जनावरे चरण्यासाठी सोडून दिली आहेत.सध्या जिल्ह्यातील १६४ सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ १६.३०% उपयुक्त जलसाठा शिल्लक असून, पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. माजी लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी बीड जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शासनाने हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.